प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Monday 9 November 2009

तो आनंदयात्री

त्याला शब्द वश आहेत. त्याने सहजपणे दोन ओळी लिहील्या तरी त्याची कविता होते. तो स्वत:ला आनंदयात्री समजतो. अनेक संकटं, दु:खं, शारिरीक दुखणी, अपघात,संघर्ष एवढं सगळं पचवूनसुद्धा त्याने मनाचा मोर सदैव थुईथुई नाचत ठेवला आहे. प्राणांच्या पुष्करणीवर आनंदाचे तुषार फ़ुलत ठेवले आहेत.
तो आयुष्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच समोर येणार्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक अनुभवावर, प्रत्येक व्यक्तीवर तो प्रेम करतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर कर्ण जसा कवचकुंडल घेवून जन्माला आला. तसा तो कविता घेऊन जन्माला आला. आणि त्याच्या कवितेला प्रेमाचं परिमाण असल्यामुळे तो लिहितो ते लहानांपासून मोठ्यांपर्यत, तरुणांपासून व्रुद्धांपर्यत सर्वांनाच आवडतं. मराठी शुभेच्छापत्रांची संकल्पना त्यानेच रुजवली असून मधु मंगेश कर्णिकांनी त्याला शुभेच्छांचा सॊदागर ही उपाधी दिली आहे.
हो, त्याचं नाव आहे प्रसाद कुलकर्णी! वास्तविक त्याचा आतापर्यतचा सारा प्रवास अडचणींना तोंड देतच झालेला आहे. कोकणातल्या खेडेगावात जन्मलेला, वाढलेला आणि जात्याच बुध्दीमान असलेला हा मुलगा शालान्त परिक्षेत गुणवत्ता यादीत येणारा अशी सर्वांची अपेक्षा होती. पण कौटुंबिक आपत्तींमुळे घराचं घरपण विस्कळीत झालं आणि त्यात अभ्यासाचा सूर हरवला. अपेक्षेएवढे गुण मिळू शकले नाहीत. मग त्याने नोकरीसाठी सरळ मुंबईचा रस्ता धरला. मुंबईला आल्यावर माणसांच्या महासागरात त्याने आपली मूळची निसर्गसुंदर लोभसवाणी कविता जगवली... नुसती जगवली नाही, तर फ़ुलवली देखील! त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून की काय, नियतीने अनेक सुवर्णयोगही त्याच्या ओंजळीत घातले. मधु मंगेश कर्णिक, माधव गड्करी, मंगेश पाडगावकर अशा दिग्गजांशी त्याचा हेवा वाटावा असा दोस्ताना जमला. त्याने लिहिलेलं पहिलं भावगीत रेडीयोकरता उषा मंगेशकरांनी गायलं! त्याची पहिली ध्वनीफ़ित स्वरबध्द केली पंडीत यशवंत देवांनी! त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटगीताला आवाज लाभला हिंदी सुपरस्टार गायक शानचा! शुभेच्छापत्रांवरील काव्यमय संदेश लेखनाने त्याचं नाव घराघरात पोहोचवलं. मिलींद इंगळेच्या सांजगारवासाठी लिहिलेल्या कवितांनी त्यावर कळस चढवला. ४ कवितासंग्रह.... ५ ध्वनिफिती.... ६ चित्रपट.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ आणि लोकसत्तासारख्या लोकप्रिय दैनिकातले स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढे बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.