प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Sunday 13 December 2009

श्रीधर फडके आणि प्रसाद एकत्र...

श्रीधर फडकेंसोबत प्रसादने केलेल्या नव्या गाण्याची जन्मकथा त्याच्याच शब्दात - श्रीधर फडकेंसोबत एखादं गाणं करणं हा केवढा तरी सम्रुद्ध करणारा अनुभव असतो. वयाचं अंतर ओलांडूनही त्यांची माझी दोस्ती तशी दीड दशकाची म्हणायला हरकत नाही. पण आम्ही एकत्र गाणं करण्याचा योग कधी आला नव्हता. तो या गाण्यामुळे आला. श्रीधरजींना कुणीतरी पुण्याहून कवितेच्या दोन ओळी sms केल्या. त्यांना त्या एवढ्या आवडल्या की त्यांनी पुण्याला फोन करुन विचारलं, या ओळी कुणाच्या आहेत.... माझं नाव कळल्यावर त्यांनी मला फोन करुन सांगितलं, ’प्रसादराव, याचं आपण गाणं करायचं का? ’ मी म्हटलं, ’अरे व्वा!, करायचं का म्हणजे काय, माझ्याकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुमच्याकडे माझ्या या दोन ओळी आल्यात ना त्या म्हणजे एका कवितेच्या एका कडव्याचा भाग आहेत. मी तुम्हाला अख्खी कविताच पाठवतो.’ श्रीधरजी म्हणाले, ’ह्या दोन ओळी मला फार आवडल्यायत. आपण या कडव्याचा मुखडा करायचा आणि बाकी सारं गाणं नव्याने लिहायचं’ आता आली पंचाईत. एवढी सुंदर कविता, तिची मोडतोड करायला माझं मन तयार होईना. शेवटी हो-ना करता करता मी तयार झालो. होळीनंतरचा दुसरा दिवस येतो, धुळवड... त्या दिवशी सारेजण रंग खेळत होते. मी आणि श्रीधरजी मात्र पार्ल्याच्या घरी सकाळपासून पेटी काढून बसलो होतो. श्रीधरजी एकेका शब्दाला, एकेका ओळीला तीन-चार प्रकारे चाल लावायचे आणि मला विचारायचे,’ही कशी वाटते सांगा?’ मग मला मी नव्याने बनवलेल्या या गाण्यातला एखादा शब्द बदलायला अगदी पोलाईटली सुचवायचे. मी ईरीटेट होत असे. पण शेवटी आमची तडजॊड होत असे. एवढे मोठे संगीतकार आणि वयाने मला जेष्ठ असूनही कधी ते नमतं घेत. कधी मी घेत असे. शहाण्या मुलासारखा त्यांना अडणारा शब्द बदलत असे. मार्च २००९ मध्ये सुरु झालेलं या गाण्याच्या निर्मितीचं आमचं काम स्वप्निल बांदोडकरच्या आवाजात रेकॉर्ड व्हायला डिसेंबर महीना उजाडला. या कालावधीत शब्द आणि सूर यांवर आम्ही दोघांनी एकूण ३३ तास मेहनत घेतली. एकेका शब्दासाठी, एकेका सूरासाठी झगडलो. मध्यंतरी काही कामासाठी यशवंत देवांना फोन केला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर देवसाहेब मला म्हणाले, ’सध्या नविन काय करताय?’ मी म्हटलं, ’काळाच्या पाटीवर शीलालेख कसा खोदला जातो, ते श्रीधर फडकेंकडून शिकतोय.’ असे सुंदर शब्द जमलेत, श्रीधरजींनी अशी सुंदर चाल लावली्य आणि स्वप्निल बांदोडकर अशा मेहनतीने गायलाय की हे गाणं हीट होणार हे मी खात्रीने सांगू शकतो. लवकरच ऐकू लागाल तुम्ही... या वस्तीवर या घटकेला सर्व ॠतुंचे सहर्ष स्वागत. रंग फुलांचे या रस्त्यावर मिरवत जाती वाजत गाजत.... आनंदाला बहर असा की इंद्र्धनुही उतरे खाली. अंधाराचा पडघम वाजे वारा वाहे गंधपखाली...

Saturday 5 December 2009

नवा कार्यक्रम - बी पॉझिटीव्ह

पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अर्थात सकारात्मक मनोव्रुत्ती या विषयावरील प्रसाद्च्या बी पॉझिटिव्ह या नव्या कार्य्क्रमाच्या माहितीकरता खालील ब्लॉग पहा: http://bpositiveprasad.blogspot.com/