प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Sunday 13 December 2009

श्रीधर फडके आणि प्रसाद एकत्र...

श्रीधर फडकेंसोबत प्रसादने केलेल्या नव्या गाण्याची जन्मकथा त्याच्याच शब्दात - श्रीधर फडकेंसोबत एखादं गाणं करणं हा केवढा तरी सम्रुद्ध करणारा अनुभव असतो. वयाचं अंतर ओलांडूनही त्यांची माझी दोस्ती तशी दीड दशकाची म्हणायला हरकत नाही. पण आम्ही एकत्र गाणं करण्याचा योग कधी आला नव्हता. तो या गाण्यामुळे आला. श्रीधरजींना कुणीतरी पुण्याहून कवितेच्या दोन ओळी sms केल्या. त्यांना त्या एवढ्या आवडल्या की त्यांनी पुण्याला फोन करुन विचारलं, या ओळी कुणाच्या आहेत.... माझं नाव कळल्यावर त्यांनी मला फोन करुन सांगितलं, ’प्रसादराव, याचं आपण गाणं करायचं का? ’ मी म्हटलं, ’अरे व्वा!, करायचं का म्हणजे काय, माझ्याकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुमच्याकडे माझ्या या दोन ओळी आल्यात ना त्या म्हणजे एका कवितेच्या एका कडव्याचा भाग आहेत. मी तुम्हाला अख्खी कविताच पाठवतो.’ श्रीधरजी म्हणाले, ’ह्या दोन ओळी मला फार आवडल्यायत. आपण या कडव्याचा मुखडा करायचा आणि बाकी सारं गाणं नव्याने लिहायचं’ आता आली पंचाईत. एवढी सुंदर कविता, तिची मोडतोड करायला माझं मन तयार होईना. शेवटी हो-ना करता करता मी तयार झालो. होळीनंतरचा दुसरा दिवस येतो, धुळवड... त्या दिवशी सारेजण रंग खेळत होते. मी आणि श्रीधरजी मात्र पार्ल्याच्या घरी सकाळपासून पेटी काढून बसलो होतो. श्रीधरजी एकेका शब्दाला, एकेका ओळीला तीन-चार प्रकारे चाल लावायचे आणि मला विचारायचे,’ही कशी वाटते सांगा?’ मग मला मी नव्याने बनवलेल्या या गाण्यातला एखादा शब्द बदलायला अगदी पोलाईटली सुचवायचे. मी ईरीटेट होत असे. पण शेवटी आमची तडजॊड होत असे. एवढे मोठे संगीतकार आणि वयाने मला जेष्ठ असूनही कधी ते नमतं घेत. कधी मी घेत असे. शहाण्या मुलासारखा त्यांना अडणारा शब्द बदलत असे. मार्च २००९ मध्ये सुरु झालेलं या गाण्याच्या निर्मितीचं आमचं काम स्वप्निल बांदोडकरच्या आवाजात रेकॉर्ड व्हायला डिसेंबर महीना उजाडला. या कालावधीत शब्द आणि सूर यांवर आम्ही दोघांनी एकूण ३३ तास मेहनत घेतली. एकेका शब्दासाठी, एकेका सूरासाठी झगडलो. मध्यंतरी काही कामासाठी यशवंत देवांना फोन केला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर देवसाहेब मला म्हणाले, ’सध्या नविन काय करताय?’ मी म्हटलं, ’काळाच्या पाटीवर शीलालेख कसा खोदला जातो, ते श्रीधर फडकेंकडून शिकतोय.’ असे सुंदर शब्द जमलेत, श्रीधरजींनी अशी सुंदर चाल लावली्य आणि स्वप्निल बांदोडकर अशा मेहनतीने गायलाय की हे गाणं हीट होणार हे मी खात्रीने सांगू शकतो. लवकरच ऐकू लागाल तुम्ही... या वस्तीवर या घटकेला सर्व ॠतुंचे सहर्ष स्वागत. रंग फुलांचे या रस्त्यावर मिरवत जाती वाजत गाजत.... आनंदाला बहर असा की इंद्र्धनुही उतरे खाली. अंधाराचा पडघम वाजे वारा वाहे गंधपखाली...

Saturday 5 December 2009

नवा कार्यक्रम - बी पॉझिटीव्ह

पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अर्थात सकारात्मक मनोव्रुत्ती या विषयावरील प्रसाद्च्या बी पॉझिटिव्ह या नव्या कार्य्क्रमाच्या माहितीकरता खालील ब्लॉग पहा: http://bpositiveprasad.blogspot.com/

Monday 9 November 2009

तो आनंदयात्री

त्याला शब्द वश आहेत. त्याने सहजपणे दोन ओळी लिहील्या तरी त्याची कविता होते. तो स्वत:ला आनंदयात्री समजतो. अनेक संकटं, दु:खं, शारिरीक दुखणी, अपघात,संघर्ष एवढं सगळं पचवूनसुद्धा त्याने मनाचा मोर सदैव थुईथुई नाचत ठेवला आहे. प्राणांच्या पुष्करणीवर आनंदाचे तुषार फ़ुलत ठेवले आहेत.
तो आयुष्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच समोर येणार्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक अनुभवावर, प्रत्येक व्यक्तीवर तो प्रेम करतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर कर्ण जसा कवचकुंडल घेवून जन्माला आला. तसा तो कविता घेऊन जन्माला आला. आणि त्याच्या कवितेला प्रेमाचं परिमाण असल्यामुळे तो लिहितो ते लहानांपासून मोठ्यांपर्यत, तरुणांपासून व्रुद्धांपर्यत सर्वांनाच आवडतं. मराठी शुभेच्छापत्रांची संकल्पना त्यानेच रुजवली असून मधु मंगेश कर्णिकांनी त्याला शुभेच्छांचा सॊदागर ही उपाधी दिली आहे.
हो, त्याचं नाव आहे प्रसाद कुलकर्णी! वास्तविक त्याचा आतापर्यतचा सारा प्रवास अडचणींना तोंड देतच झालेला आहे. कोकणातल्या खेडेगावात जन्मलेला, वाढलेला आणि जात्याच बुध्दीमान असलेला हा मुलगा शालान्त परिक्षेत गुणवत्ता यादीत येणारा अशी सर्वांची अपेक्षा होती. पण कौटुंबिक आपत्तींमुळे घराचं घरपण विस्कळीत झालं आणि त्यात अभ्यासाचा सूर हरवला. अपेक्षेएवढे गुण मिळू शकले नाहीत. मग त्याने नोकरीसाठी सरळ मुंबईचा रस्ता धरला. मुंबईला आल्यावर माणसांच्या महासागरात त्याने आपली मूळची निसर्गसुंदर लोभसवाणी कविता जगवली... नुसती जगवली नाही, तर फ़ुलवली देखील! त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून की काय, नियतीने अनेक सुवर्णयोगही त्याच्या ओंजळीत घातले. मधु मंगेश कर्णिक, माधव गड्करी, मंगेश पाडगावकर अशा दिग्गजांशी त्याचा हेवा वाटावा असा दोस्ताना जमला. त्याने लिहिलेलं पहिलं भावगीत रेडीयोकरता उषा मंगेशकरांनी गायलं! त्याची पहिली ध्वनीफ़ित स्वरबध्द केली पंडीत यशवंत देवांनी! त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटगीताला आवाज लाभला हिंदी सुपरस्टार गायक शानचा! शुभेच्छापत्रांवरील काव्यमय संदेश लेखनाने त्याचं नाव घराघरात पोहोचवलं. मिलींद इंगळेच्या सांजगारवासाठी लिहिलेल्या कवितांनी त्यावर कळस चढवला. ४ कवितासंग्रह.... ५ ध्वनिफिती.... ६ चित्रपट.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ आणि लोकसत्तासारख्या लोकप्रिय दैनिकातले स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढे बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.

Tuesday 27 October 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...

निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी

Friday 4 September 2009

प्रसाद्चा सातवा चित्रपट

’नातवंडे’ हा प्रसाद कुलकर्णी यांचा गीतकार म्हणून सातवा चित्रपट दिवाळीच्या सुमारास येऊ घातला आहे. दिलीप प्रधान हे या कौटुंबिक चित्रपटचे दिग्दर्शक असून प्रसादची यातली ३ गाणी साधना सरगम आणि रविन्द्र साठे हे गाणार आहेत. त्यापैकी पहिल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण नुकतेच ’गॉडस गिफ्ट’ वर्सोवा येथे पार पडले.

Sunday 1 March 2009

My Beloved Husband Prasad

This is about a story of poet named Prasad Kulkarni, My beloved husband, A most popular and a versatile poet in Marathi. He rules over the world of words. He is the pioneer of Marathi Greeting cards. Poet of Milind Ingle's popular album Saanj Garva. Writer of Prasadik, the popular column in लोकप्रभा. His poetic account is full of more than: -4500 Marathi greeting cards. -400 shows of his Anandyatra -100 TV and Radio appearances. -9 Marathi feature films. -13 Audio albums. -4 Poetry collections. -4 Popular columns in Marathi magazines. -2 TV serials and the list is going on........ One unique thing about him is his positive attitude. He loves life... it's every moment...every happening...every person..! And thats how he lives a graceful life inspite of a lot of odds and difficulties.

Thursday 26 February 2009

देव प्रसन्न झाला की

देव प्रसन्न झाला की

पहात नाही पात्र अपात्र

मग मझ्यासारख्याच्या ओंजळीत

टाकतो तुझ्यासारखं नक्षत्र

कवी: प्रसाद कुलकर्णी